मुंबई:- मराठा आरक्षणासाठी नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या उपोषणामुळे दक्षिण मुंबईत आंदोलकांची मोठी गर्दी उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका इमारतीसमोरील परिसर, चर्चगेट स्थानक, हुतात्मा चौक अशा ठिकाणी आंदोलक जमा झाल्याने वाहतूक कोंडी झाली असून, मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दाखल जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश जारी केले.
हायकोर्टाने स्पष्ट केले की, आंदोलकांना सध्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही. तसेच मिळालेल्या अटींचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार आणि सार्वजनिक सभा-आंदोलने २०२५ च्या अंतिम नियमावलीनुसार राज्य सरकारने कार्यवाही करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे :
आंदोलकांनी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता सर्व रस्ते व ठिकाणे मोकळी करावीत.
राज्य सरकार व पोलिसांनी काळजी घ्यावी की आणखी आंदोलक मुंबईत प्रवेश करू नयेत.
जर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाला, तर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात यावेत.
मुंबईतील जनजीवन ठप्प होऊ नये, विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखावी.
याचिकेची पुढील सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता नियमित खंडपीठासमोर होणार असल्याचेही हायकोर्टाने आदेशात नमूद केले आहे.
#maharashtra #politics #manojjarange #mumbaimorcha