सोलापूर :- एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट/वैध तिकीट नसलेल्या १४.४३ लाख प्रवाशांना पकडले आणि त्यांच्या कडून एकूण रु.८६.७३ कोटींचा दंड वसूल केला.
जुलै २०२५ आणि जुलै २०२४ च्या तुलनेत मध्य रेल्वेने अनियमित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये ६२ % वाढ नोंदवली असून दंड वसुलीत १००% वाढ झाली आहे.
प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवास सुविधा देण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, मध्य रेल्वे नियमितपणे मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनमध्ये तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी ट्रेनमधील सर्व विभागांमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवते, जेणेकरून विनातिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवले जाते.
अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुख्यालय तसेच सर्व विभागांमध्ये नियमितपणे विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. यामध्ये स्थानक तपासणी , अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), किल्लाबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी (Intensive checks) आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मधील (एप्रिल ते जुलै 2025) कालावधीत, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी वैध तिकीट अथवा प्रवास परवाना नसलेल्या १४.४३ लाख प्रवाशांना पकडले असून, त्यांच्या कडून एकूण रु.८६.७३ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने या कालावधीसाठी निश्चित केलेल्या रु ८१.४८ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न ६.४४% ने अधिक असून, तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसूलामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
जुलै २०२५ मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या ३.०८ लाख प्रवाशांना पकडले आहे, तर जुलै २०२४ मधील १.९१ लाख प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण ६२% वाढले आहे. जुलै २०२५ मध्ये विनातिकीट वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून दंड म्हणून १६.०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, जे जुलै २०२४ मधील रू. ७.९७ कोटी रुपयांच्या तुलनेत १००% पेक्षा जास्त वाढ दर्शवते.
आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते जुलै २०२५) साठी वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विभागवार माहिती आणि त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम खालीलप्रमाणे :
• भुसावळ विभागात ३.८५ लाख प्रकरणांमधून ३३.४९ कोटी रुपये,
• मुंबई विभागात ५.७३ लाख प्रकरणांमधून २४.२९ कोटी रुपये
• नागपूर विभागात १.५६ लाख प्रकरणांमधून ९.७६ कोटी रुपये
• पुणे विभागात १.५२ लाख प्रकरणांमधून ८.४२ कोटी रुपये
• सोलापूर विभागात ८५,००० प्रकरणांमधून ४.१८ कोटी रुपये आणि
• मुख्यालयात ९१,००० प्रकरणांमधून ६.५८ कोटी रुपये.
मध्य रेल्वे अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करण्यास वचनबद्ध आहे.
मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन आहे कि, प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून सन्मानाने प्रवास करावा.